रत्नागिरी: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीएनजी पुरवठ्याबाबत उपाययोजना करण्याबाबत रिक्षा सेनेने महानगर गॅस कंपनीला निवेदन सादर केले.
येत्या २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरवात होत आहे.
कोकणातील हा महत्त्वाचा सण आहे. यामुळे या सणाला येणाऱ्या भाविकांची स्वतःच्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या जिल्ह्यातील रिक्षा व्यवसायदेखील सीएनजी गॅसवर अवलंबून आहे. गेल्या एप्रिल-मे महिन्यात रिक्षा व्यावसायिकांचे गॅसअभावी खूप नुकसान झाले आहे. सध्यादेखील गॅस पुरवठा समाधानकारक होत नाही. काही वेळेला गॅस असेल तर प्रेशर कमी असल्याची अडचण दिसून येते.
येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हातील प्रत्येक ठिकाणी गॅस पुरवठा होण्यासाठी उपाययोजना सुरू कराव्यात, या मागणीसाठी रिक्षा सेनेच्या वतीने महानगर गॅस कंपनीला निवेदन देण्यात आले. महानगर गॅसचे अमोल शिंदे यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी रिक्षा सेनेचे उपसंघटक अविनाश कदम, शहर संघटक मिलिंद हातपले, नितीन तळेकर, सुहास हातिसकर, सचिन गुरव, रमेश महाडिक, योगेश हातपले, संजय कांबळी उपस्थित होते.
रत्नागिरी : गणेशोत्सवातील सीएनजी पुरवठ्याबाबत रिक्षा सेनेचे निवेदन
