पाचलमध्येच आता महावितरणच्या तक्रारींचे निराकरण; आठवडाबाजाराच्या दिवशी अधिकारी राहणार उपस्थित

Gramin Varta
37 Views

पाचल / तुषार पाचलकर: पाचल परिसरातील सुमारे ४० गावांतील वीजग्राहकांना वीजबिल, वीजपुरवठा तसेच महावितरणशी संबंधित विविध तक्रारींसाठी पाचल बाजारपेठेपासून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावरील विद्युत कार्यालयात जावे लागत होते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही गैरसोय अखेर दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता प्रत्येक बुधवारी पाचलच्या आठवडा बाजाराच्या दिवशी महावितरणचे अधिकारी ग्रामपंचायत इमारतीखाली उपलब्ध राहून वीजग्राहकांच्या तक्रारी व सूचना ऐकून घेणार आहेत.

वीजबिलातील त्रुटी, मीटरसंबंधी समस्या, वीजपुरवठ्यातील अडचणी तसेच महावितरणशी संबंधित अन्य तक्रारींसाठी ग्राहकांना वारंवार विद्युत कार्यालयात पायपीट करावी लागत होती. या समस्येबाबत ग्रामपंचायत पाचल तसेच व्यापारी संघटना पाचल यांच्या वतीने महावितरणच्या पाचल व राजापूर येथील अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने ग्राहकांची गैरसोय कायम होती.

अखेर व्यापारी संघटना पाचल यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे समस्या मांडली. आमदार सामंत यांनी तातडीने याची दखल घेत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर पाचलमध्येच ठराविक दिवशी महावितरणचे अधिकारी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यानुसार, प्रत्येक बुधवारी पाचलच्या आठवडा बाजाराच्या दिवशी ग्रामपंचायत इमारतीखाली महावितरणचे अधिकारी एक दिवस उपस्थित राहणार असून, वीजग्राहकांच्या तक्रारी, सूचना व अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील ग्राहकांना प्रत्येक छोट्या-मोठ्या तक्रारीसाठी विद्युत कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

दरम्यान, ग्रामपंचायत पाचलनेही या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून, परिसरातील सुमारे ४० गावांतील वीजग्राहकांची गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायत मालकीचे कार्यालय महावितरणला मोफत उपलब्ध करून दिले आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना स्थानिक पातळीवरच महावितरणच्या सेवा व तक्रार निवारणाची सुविधा मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने मार्गी लागल्याने पाचल परिसरातील वीजग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार सामंत, ग्रामपंचायत पाचल तसेच व्यापारी संघटनेचे नागरिकांकडून आभार मानले जात आहेत.

पाचल परिसरातील वीजग्राहकांसाठी महावितरणची ही स्थानिक पातळीवरील सुविधा भविष्यात तक्रार निवारण अधिक सुलभ आणि गतिमान करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Total Visitors :
4761362
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *