देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील देवडे बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले विजय शांताराम कांबळे (वय ५०) हे गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्यांचे वडील शांताराम सोमा कांबळे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत शोधमोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय कांबळे हे २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून साखरपा येथे जातो असे सांगून बाहेर पडले होते. मात्र, दीर्घ काळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. सुरुवातीला विजय हे पूर्वीप्रमाणेच काही दिवसांनी स्वतःहून घरी परत येतील, या आशेने कुटुंबीयांनी त्यांची वाट पाहिली. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही त्यांचा कोणताही पत्ता न लागल्याने अखेर २६ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या वडिलांनी देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगा बेपत्ता झाल्याची खबर दिली.
बेपत्ता विजय कांबळे यांचे वर्णन सांगताना पोलिसांनी कळवले आहे की, त्यांची उंची ४.५ फूट असून रंग सावळा आणि चेहरा गोल आहे. डोक्यावर वाढलेले काळे केस आणि वाढलेली दाढी अशी त्यांची ओळख आहे. बेपत्ता झाले त्यावेळी त्यांच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ बर्मोडा होती. त्यांच्याकडे सध्या कोणताही मोबाईल किंवा मौल्यवान वस्तू नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार गणेश जगन्नाथ सुतार करत आहेत. या वर्णनाची व्यक्ती कोणास आढळल्यास तातडीने संपर्क क्रमांक – 9623457161 पोलीस हेड कॉन्स्टेबल/गणेश सुतार. देवरुख पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस दुरुक्षेत्र साखरपा यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




