रत्नागिरी : समाजातील विविध समस्या आणि प्रश्नांवर सातत्याने काम करणारी भाकर सेवा संस्था गेली ३२ वर्षे शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि महिला सबलीकरण या क्षेत्रात कार्यरत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात तत्परतेने मदतकार्य हाच संस्थेचा परंपरागत ध्यास राहिला आहे. गुजरात भूकंप (२००१), सोलापूर दुष्काळ (२००४), कोविड-१९ (२०२०-२१) आणि चिपळूण पूर (२०२१) यांसारख्या आपत्तींत भाकरने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
गेल्या चार दशकांतील सर्वात भीषण पुरामुळे पंजाबमधील २२ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून घरे, शाळा, शेतजमिनी आणि उपजीविका उद्ध्वस्त झाल्या आहेत. कुटुंबांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकणातून मदतीचा हात पुढे करत भाकर सेवा संस्थेचे पहिले पथक आज रत्नागिरीतून रवाना झाले.
मदत मोहिमेसाठी अनेक दानशूर व्यक्तींनी योगदान दिले असून संस्थेचे संस्थापक श्री. देवेंद्र पाटील, श्री. पारस पोवार, श्री. श्रेयश घाटगे, श्री. प्रतिक घाटगे आणि श्री. श्रीधर पाटील हे या पथकात सहभागी झाले आहेत. पूरग्रस्त भागाची पाहणी करून आवश्यकता भासल्यास दुसरे पथकही तत्काळ पाठवले जाईल, अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली.
सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक नागरिकांनी या मदत मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाकर परिवाराने केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे संचालक श्री. पवनकुमार मोरे (संपर्क: ८६६९८५८३२४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







