खेड : विनापरवाना भारतात वास्तव्यास असल्याचा ठपका सिद्ध झाल्याने बांग्लादेशातील नागरिकास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेड येथील न्यायदंडाधिकारी वर्ग–१ यांनी हा निर्णय दिला.
अकबर अबू शेख (वय ६५, सध्या रा. कळंबणी, ता. खेड, मूळ रा. बांग्लादेश) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बांग्लादेशातील दारिद्र्य व बेरोजगारीला कंटाळून आरोपीने भारतात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता प्रवेश केला होता. तो खेड तालुक्यातील कळंबणी–आपेडेफाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत असून, त्याच ठिकाणी वास्तव्यास होता.
११ मार्च २०२५ रोजी ही बाब खेड पोलिसांच्या निदर्शनास आली. तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत अकबर अबू शेख यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने भारत सरकारची कोणतीही परवानगी न घेता अवैधरित्या देशात प्रवेश करून वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले.
भारताच्या सीमारेषेवर नजर चुकवून व सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता भारतात प्रवेश केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीस एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. विद्या गायकवाड यांनी यशस्वीपणे काम पाहिले.






