रत्नागिरी : शहराजवळील कारवांचीवाडी, रविंद्रनगर येथे राहणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा आजारपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुमित्रा नारायण चव्हाण (रा. फ्लॅट नं. ३०१, मैत्री अपार्टमेंट, रविंद्रनगर, कारवांचीवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना २९ डिसेंबर रोजी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित्रा चव्हाण यांना गेल्या १० वर्षांपासून क्षयरोगाचा (टीबी) त्रास होता आणि त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार सुरू होते. २९ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना खोकल्याचा त्रास वाढला. त्यामुळे त्यांचा मुलगा राजेंद्र चव्हाण यांनी त्यांना प्रथम कारवांचीवाडी येथील खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार सुमित्रा यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी ६.५३ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा राजेंद्र नारायण चव्हाण यांनी दिलेल्या खबरीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक १४८/२०२५ नुसार नोंद करण्यात आली आहे.
कारवांचीवाडी येथील वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू






