संगमेश्वर : तालुक्यातील रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावर मुर्शी येथील गोवरेवाडी फाट्याजवळ मंगळवारी सकाळी बोलेरो पिकअप, इको कार आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा पलटी होऊन शालेय मुलांसह चौघे जखमी झाले असून तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
सिद्दीक अय्याज मुल्ला (वय २६, रा. कराड) हे बोलेरो पिकअप (एमएच ५० एम ५७७७) घेऊन कराडहून रत्नागिरीकडे जात असताना गोवरेवाडी रोडजवळ इको कारला (एमएच ११ डीए ५२७५) जोरदार धडक दिली. धडकेनंतर इको कार रिक्षावर आदळली. ही रिक्षा (एमएच ०८ ई ८४३८) गंगाराम तुकाराम शिंदे चालवत होते. तीव्र धडकेमुळे रिक्षा पलटी झाली.
या घटनेत रिक्षाचालक गंगाराम तुकाराम शिंदे (वय ६२, रा. कोंडगाव), तन्वी राजू कांबळे (वय ११), स्वरा सचिन कांबळे (वय १२, रा. दख्खन बौधवाडी) आणि अंगणवाडी सेविका दीपाली दिलीप कनावजे (वय ५५, रा. मुर्शी) जखमी झाले आहेत.
जखमींना प्रथम साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देऊन पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
संगमेश्वर : मुर्शी येथे तीन वाहनांचा अपघात; शालेय मुलांसह चौघे जखमी





