रत्नागिरी : मुंबई–गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली. लांजा तालुक्यातील अंजणारी पुलाजवळ भरधाव कंटेनर पलटी होऊन रस्त्यावर आडवा पडल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने मालवाहतूक करणारा कंटेनर अंजणारी पुलावरील तीव्र वळणावर आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. क्षणातच कंटेनर उलटून रस्त्यावर आडवा पडला आणि रस्त्यालगतच्या मातीमध्ये जाऊन कोसळला. अपघात इतका भीषण होता की कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. मात्र या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कंटेनर हटवून काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र मुंबई–गोवा महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.
ब्रेकिंग : मुंबई गोवा महामार्गावर अंजणारी पुलाजवळ भरधाव कंटेनर पलटी






