रत्नागिरी : शहरालगत असलेल्या कुवारबाव रेल्वे पुलाजवळ दिवा–सावंतवाडी एक्स्प्रेस गाडीच्या धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मात्र मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसल्याने त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशी घडली, अपघात की आत्महत्या याबाबत स्पष्टता नसून सर्व बाबींच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.







