रत्नागिरी: कुणबी समाजावर अन्याय होत असल्याची वास्तव परिस्थिती मांडल्याने अनेकांना पोटदुखी झाली आहे, मात्र ही पोटदुखी येणाऱ्या काळात नक्कीच बरी केली जाईल, असा सडेतोड इशारा सुहास खंडागळे यांनी दिला आहे.
बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाने आता स्वतःच्या प्रगतीसाठी आणि हक्कासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.आपली भूमिका स्पष्ट करताना खंडागळे पुढे म्हणाले की, “कुणबी समाजावर सातत्याने अन्याय होतोय ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा आम्ही ही बाजू मांडतो, तेव्हा अनेकांच्या पोटात दुखू लागते. या पोटदुखीवर आम्ही आगामी काळात योग्य तो इलाज करूच, परंतु आता समाजानेही जागृत होणे गरजेचे आहे. लोकशाही व्यवस्थेत बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाने स्वतःच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे आणि आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःचे खंबीर नेतृत्व निवडून दिले पाहिजे. जर आम्ही समाजाच्या हिताची आणि विकासाची भाषा करत असू, तर इतरांच्या पोटात दुखण्याचे कारण काय?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सुहास खंडागळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सध्या सर्वत्र मोठी चर्चा सुरू झाली असून, समाजाच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
कुणबी समाजावर अन्याय होत असल्याची भूमिका आम्ही मांडली तर इतरांना पोटदुखीचे कारण काय ? सुहास खंडागळे यांचा सवाल





