GRAMIN SEARCH BANNER

जिल्ह्यात इंधनाचा साठा पुरेसा ; अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई- जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी:- जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. तसेच दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये. पेट्रोल पंप व सीएनजी स्टेशनवर अनावश्यक गर्दी करु नये. मध्यपूर्व आशिया, अमेरिका युरोपियन खंडात तसेच आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरविणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या तीनही कंपन्यांचे प्रतिनिधी व समन्वयक (Co-ordinator) यांच्याशी संपर्क साधून साठा आणि वितरण व्यवस्थेबाबत आढावा घेतला. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरु आहे, असे संबंधित कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे. सलग सुट्टया आल्याने पर्यटक कोकणात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी व होळी सणासाठी बाहेरगावी असणारे रत्नागिरीकर मूळ गावी आल्याने काही पेट्रोल पंपांवर गर्दी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप व गॅस एजन्सींकडून इंधनाचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरु आहे. जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सेवेस तत्पर असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे, असेही जिल्हाधिकारी श्री जिंदल यांनी म्हटले आहे.

Total Visitor Counter

3485608
Share This Article