GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गाचे उद्घाटन करणार नाही; १६ वर्षांच्या विलंबाबाबत नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

Gramin Varta
122 Views

मुंबई: गेल्या १६ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे आणि खळबळजनक विधान केले असून, या महामार्गाचे आपण उद्घाटन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या या महामार्गाचे काम दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने आणि त्यामध्ये झालेल्या विलंबाबाबत गडकरींनी जाहीरपणे खेद व्यक्त केला आहे. समृद्धी महामार्गासारखे मोठे प्रकल्प पूर्ण झाले तरी १६ वर्षे उलटूनही हा मार्ग पूर्ण होऊ शकला नाही, ही वस्तुस्थिती स्वीकारताना त्यांनी संकोच वाटत असल्याची प्रांजळ कबुली दिली. गणेशोत्सव आणि शिमग्यासारख्या सणांना कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या मार्गावरील दुर्दशेमुळे प्रचंड यातना सहन कराव्या लागतात, याची दखल घेत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

सध्या या महामार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून मे महिन्यापर्यंतची वाढीव डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, प्रकल्पाला झालेला अतोनात विलंब पाहता, अशा जुन्या आणि रखडलेल्या कामाचे औपचारिक उद्घाटन करणे आपल्याला योग्य वाटत नसल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. या मार्गाच्या उद्घाटनाचा सोहळा करण्याऐवजी, पुढील महिन्यात आपण स्वतः मुंबई ते गोवा असा प्रवास करून या संपूर्ण मार्गाच्या कामाचे प्रत्यक्ष परीक्षण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता हा मार्ग पूर्णत्वाकडे जात असताना, केंद्रीय मंत्र्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Total Visitor Counter

3140511
Share This Article