मुंबई : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यात गतवर्षात ३० लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी चार लाख घरे पूर्ण झाली आहेत, तर दहा लाख घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. गत चौदा वर्षांत राज्यात एकूण २६ लाख घरकुले बांधली आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.सतिश चव्हाण, शिवाजीराव गर्जे, प्रवीण दरेकर, भाई जगताप आदींनी या बाबत प्रश्न विचारला होता.राज्यात गत काही महिन्यांत सुमारे ३० लाख घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी चार लाख घरांचे काम पूर्ण झाले आहे, तर दहा लाख घरकुलांना तिसरा हप्ता देण्यात आला असून, त्यांचे काम गतीने सुरू आहे. घरकुलांना एकत्रित २ लाख १० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. केंद्र सरकार १.२० लाख, २८ हजार मनरेगा योजनेतून, १२ हजार स्वच्छ भारत मिशन योजनेतून दिले जाते.
राज्य सरकार ५० हजार अनुदान देते. त्यात ३५ घरकुलासाठी आणि १५ हजार सौरऊर्जेसाठी दिले जातात, असे एकूण २.१० लाख रुपयांचे अनुदान मिळते.बेघरांना जमिनीसह घरकुलराज्यातील ज्या बेघरांकडे जमीन नाही, अशांना घरकुल देण्यात येते. गायरान, गावठाणातील जागा दिली जाते. जागा उपलब्ध नसेल तर जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. काही लाभार्थींनी एकत्र येऊन जमीन खरेदी केली तर बहुमजली इमारत बांधता येईल, तशी परवानगी दिली जाते. घरकुलांना पाच ब्रास वाळू मोफत दिली जाते. केंद्र सरकारने अनुदानात वाढ करावी, अशी मागणीही राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. सरकारने घरकुलांचे १६ हजार ४२६ अतिक्रमणे नियमित केली आहेत. १.१३ लाख लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आले आहे. पण, काही जणांनी गायरान, सरकारी जमिनीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. घरकुलांसाठीची जागा वगळता अन्य अतिक्रमणे नियमित करणे शक्य होणार नाही, असेही गोरे म्हणाले.





