सुरेंद्र काबदुले उपाध्यक्ष तर मुझम्मील काझी यांची सरचिटणीस पदी नियुक्ती
श्यामकर्ण भोपळकर जिल्हाध्यक्ष पदी कायम तर अमित गमरे संगमेश्वर तालुका अध्यक्ष म्हणून कायम, सुकांत पाडळकर यांची रत्नागिरी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती
देवरुख:गाव विकास समिती संघटनेच्या कोअर कमिटीने नव्या कार्यकारिणीबाबत शिफारस केलेल्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, देवरुख येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संघटनेची नवीन फळी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्यात झालेल्या सविस्तर चर्चेनंतर ही अंतिम कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून, यामध्ये अनेक अनुभवी व नवीन चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. आगामी काळात संघटनेची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.नव्या कार्यकारिणीनुसार उदय गोताड हे अध्यक्षपदी, तर सुहास खंडागळे संघटन प्रमुख म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
उपाध्यक्षपदी सुरेंद्र काबदुले, मंगेश धावडे आणि राहुल यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या अत्यंत महत्त्वाच्या सरचिटणीस पदी मंगेश कांगणे आणि मुझम्मील काझी यांची निवड झाली असून, मुझम्मील काझी यांच्यावर मुख्य प्रवक्ता म्हणूनही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्याच्या संघटनात्मक बांधणीसाठी श्यामकर्ण भोपळकर यांना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी कायम ठेवण्यात आले आहे, तर सुकांत पाडळकर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. सतेश जाधव यांच्याकडे जिल्हा सरचिटणीस व मुख्य प्रचारक पदाची जबाबदारी दिली असून विशाल धुमक यांची जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे.
तालुका पातळीवर संगमेश्वर तालुका अध्यक्ष पदी अमित गमरे यांना कायम ठेवण्यात आले असून, त्यांच्या सोबतीला वैभव जुवळे (कार्याध्यक्ष), नितीन गोताड (उपाध्यक्ष), दैवत पवार (सरचिटणीस), महेंद्र घुग (संघटक) आणि प्रकाश खंडागळे (सचिव) अशी टीम देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुकांत पाडळकर यांच्याकडे रत्नागिरी तालुका अध्यक्ष पदाची ही धुरा सोपवण्यात आली आहे.
महिला आघाडीच्या सक्षमीकरणासाठी सौ. दीक्षा खंडागळे यांची अध्यक्षा, सौ. ईश्वरी यादव यांची उपाध्यक्षा, तर सौ. उजमा मापारी-खान यांची सरचिटणीस पदी निवड झाली असून, सौ. अनवी घुग व सौ. नियती गोताड यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. नव्या दमाच्या या कार्यकारिणीमुळे गाव विकास समितीच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






