राजापूर: तालुक्यातील भुईबावडा परिसरात एका १६ वर्षीय मुलावर लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याला गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी संशयित आरोपी मनिष राजाराम आरडे (रा. काजिर्डा, राजापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पीडित मुलाच्या आईने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी २.३० च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी यांचा मुलगा स्रवेद दिलीप शेरे हा ट्रॅव्हल्स गाडीतून उतरल्यानंतर आपला मित्र मनिष आरडे याच्यासोबत मोटारसायकलवरून घरी जाण्यासाठी निघाला होता. मात्र, घराकडे जात असताना संशयित आरोपी मनिष याने भुईबावडा येथील रस्त्याजवळ मोटारसायकल थांबवून स्रवेद याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात स्रवेद याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला, डाव्या कानावर आणि कंबरेवर गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेनंतर पीडित मुलाच्या आईने १७ मार्च रोजी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयित आरोपी मनिष राजाराम आरडे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७/२०२६ नुसार दाखल केला आहे. मित्रानेच अशा प्रकारे अचानक हल्ला का केला, याबाबत पोलीस अधिक तपास करत असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.






