GRAMIN SEARCH BANNER

दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी महाराष्ट्र दिनी आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
219 Views

रत्नागिरी: कोरोना काळापासून बंद असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करण्यास मध्य रेल्वे प्रशासन टाळाटाळ करीत असून गाडी तत्काळ सुरू न केल्यास महाराष्ट्र दिनी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या सुमारे ३० वर्षांपासून कोकणवासीयांची जीवनवाहिनी ठरलेली ही पॅसेंजर गाडी कोरोना काळात दादरऐवजी दिवा स्थानकातून चालवण्यात येत होती. मात्र कोरोना महामारी संपल्यानंतरही गाडी पूर्ववत दादर-रत्नागिरी मार्गावर सुरू करण्यात आलेली नाही. याबाबत प्रवासी संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी अनेकदा पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

दादर हे मध्यवर्ती स्थानक असल्यामुळे पश्चिम व मध्य रेल्वे प्रवाशांसाठी सोयीचे आहे. सध्या दिवा स्थानकावरून प्रवास करताना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक गाडी सुरू करत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, उत्तर भारताकडे जाणाऱ्या नवीन गाड्यांना दादर स्थानकात प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो, मात्र कोकणच्या गाडीसाठीच जागा नसल्याचे कारण दिले जात असल्याने हा दुजाभाव असल्याची टीका होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुरेश दसम यांनी इशारा देताना सांगितले की, महाराष्ट्र दिनापूर्वीच दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी, अन्यथा कोकणवासीयांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. आंदोलनामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस रेल्वे प्रशासन जबाबदार राहील.

कोकणवासीयांनी आता थेट कोकण रेल्वेच्या मुख्यालयावर धडक देण्याची तयारी सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Total Visitor Counter

3198649
Share This Article