रत्नागिरी (प्रतिनिधी): शहरातील राजीवडा पुलाखालील परिसरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाला जुन्या वादातून आणि संशयातून चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी अरमान नझीर होडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात रमजान नवाज मिरकर, साजिद बावा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ मार्च २०२६ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून, जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरमान होडेकर आणि संशयित आरोपी हे सर्वजण एकाच परिसरातील रहिवासी असून एकमेकांच्या परिचयाचे आहेत. या वादाचे मूळ जैतापूर येथील एका सामायिक मैत्रिणीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. संबंधित मैत्रिणीने रमजान मिरकर याचे काही सामान फिर्यादी अरमानकडे दिले होते. हे सामान पोहोचवत असताना, फिर्यादी हा त्या तरुणीला का भेटतो आणि तिच्याशी का बोलतो, असा संशय रमजान मिरकर याने मनात धरला होता. याच रागातून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, ज्याचे रूपांतर पुढे हिंसक हाणामारीत झाले.
या वादावेळी रमजान नवाज मिरकर याला साजिद बावा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर यांनी साथ दिली. या चौघांनी मिळून फिर्यादी अरमान याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने त्याच्या पाठीवर, कमरेवर व उजव्या पायावर जबर प्रहार करून त्याला गंभीर दुखापत केली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. २७ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी अधिकृत नोंद केली असून, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याचा वापर करून मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत.







