मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमाचा समारोप आज अत्यंत उत्साहात संपन्न झाला. प्रशासकीय कामात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा आणि सेवाकर्मींचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्यात पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक लोकाभिमुख व्हावी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, या उद्देशाने या ई-गव्हर्नन्स सुधारणा राबवण्यात आल्या होत्या. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या सुधारणांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल आणि उत्तम प्रशासन व्यवस्था निर्माण केल्याबद्दल हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ई-गव्हर्नन्समुळे सरकारी कामातील विलंब टाळता येतो आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो, असे प्रतिपादन केले. या सन्मानानंतर पोलीस दलातून तसेच विविध प्रशासकीय स्तरातून नितीन बगाटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






