गुहागर– एप्रिल महिन्यात गुहागर येथे कासव महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय नगर पंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यावसायिक, पर्यटनप्रेमी आणि नागरिकांना महोत्सवाचे प्रात्यक्षिक कांदळवन प्रतिष्ठानतर्फे दाखविण्यात येणार आहे.
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या ६ कासव संवर्धन केंद्रे उभारण्यात आली असून, येथून दररोज कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. हा निसर्गरम्य आणि दुर्मीळ अनुभव पर्यटकांना प्रत्यक्ष पाहता यावा, तसेच वनविभागाच्या शेड्युल ‘अ’ श्रेणीतील ऑलिव्ह रिडले कासवांच्या जीवनचक्राची माहिती मिळावी, यासाठी कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे गुहागरच्या समुद्र पर्यटनालाही चालना मिळणार आहे. या संदर्भात नगराध्यक्ष नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, नगरसेवक, मुख्याधिकारी, पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय वनाधिकारी किरण ठाकूर, वेळास कासव महोत्सवाचे प्रणेते भाऊ काटदरे आणि कांदळवन प्रतिष्ठानचे मोहन उपाध्ये उपस्थित होते.
भाऊ काटदरे यांनी कासव महोत्सवाच्या यशासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कासव संवर्धनाशी संबंधित सर्व कामे वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानकडूनच केली जातील, नागरिकांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पर्यटकांना योग्य मार्गदर्शन, नियमांचे पालन आणि गुहागरचा इतिहास, निसर्गसौंदर्य, पक्षीनिरीक्षण व धार्मिक पर्यटन यांची जोड देऊन पर्यटकांचा मुक्काम वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. मोहन उपाध्ये यांनी कासव संवर्धनातील नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित केली. कासवांच्या पिल्लांना हाताळणे किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांचा वापर करून जाहिरात करणे टाळावे, तसेच मोठ्या पर्यटन संस्थांकडून होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना सुरुवातीपासूनच आळा घालावा, असे त्यांनी सांगितले.
गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी






