रत्नागिरी: येथील मिरकरवाडा स्थित मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयात सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असलेले शंकर केशव चव्हाण हे ३१ मार्च रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. सलग ३४ वर्षे आणि ८ महिने इतका प्रदीर्घ काळ अत्यंत निष्ठा व प्रामाणिकपणे सेवा बजावल्याबद्दल कार्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
या निवृत्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अक्षया मयेकर यांनी चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला. चव्हाण यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात दाखवलेली कर्तव्यदक्षता आणि शिस्त ही इतर कर्मचाऱ्यांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. ३४ वर्षांहून अधिक काळ एकाच निष्ठेने काम करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगत त्यांनी चव्हाण यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या भावनिक सोहळ्यात शंकर चव्हाण यांनी आपल्या सेवाकाळातील विविध आठवणींना उजाळा दिला. अनेक चढ-उतार पाहिले तरी सहकारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रेमामुळे हा प्रवास सुखकर झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चव्हाण यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला जीवन सावंत, प्रवीण सुर्वे, लतिका गावडे, एस. कपाळे, शितल चव्हाण यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत उत्साही आणि तितक्याच भावूक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याची सांगता उपस्थित सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छांनी झाली.





