राजापूर: शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राजापूर तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँकांमधील सातशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र ठरले आहेत; मात्र त्यांपैकी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडल्यामुळे त्यांना कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत तालुक्यातील सातशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र ठरले होते. यांपैकी तीनशे नव्वद कर्जदारांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे तीनशे छप्पन्न शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित आहेत. त्यात ॲग्रीस्टॅक अर्थात फार्मर आयडी नसलेली एक्कारन्नो खाती आहेत. तसेच जमीन नावावर नसलेले एकशे तेवीस, मयत कर्जदार वीस, देवस्थान व भोगवटदार वर्ग दोन, तीन व खंडकरीचे एकवीस, बायोमॅट्रीक कॅप्चर न होणारे दहा, परगावी व स्थलांतरित झालेले सहा आणि इतर कारणे असलेले एकशे बावीस शेतकरी आहेत. शासकीय नियमांनुसार कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण अत्यंत अनिवार्य आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी निर्धारित कालावधीत आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, कृषी पीक कर्जखाती सातशे पंच्याहत्तर असून, आधार प्रमाणीकरण झालेली कर्जखाती तीनशे नव्वद तर आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेली कर्जखाती तीनशे छप्पन्न आहेत.




