मुंबई: इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनिश्चितता वाढली असली, तरी मुंबईतीलआंबा बाजारावर त्याचा थेट मोठा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही. मात्र, वाहतूकखर्च, इंधनदर आणि निर्यात व्यवहारांवर होणाऱ्या संभाव्य परिणामामुळे व्यापाऱ्यांमध्ये सावध भूमिका दिसून येत आहे.
कोकण पट्टयातून मुंबईत हापूस आंब्याची आवक सध्या सर्वसाधारण आहे. हंगामाच्या सुरुवातीला थोडी घट जाणवली होती, मात्र या आठवड्यात आवक वाढल्याने बाजारात स्थिरता आहे. वाशी एपीएमसी मार्केट आणि भायखळा मार्केट येथे दररोज मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत आहे. रत्नागिरी, देवगड तसेच दक्षिणेतून आंब्याची आवक वाढली आहे. याचे कारण सध्या आखाती देशात निर्यात बंद असल्याने मुंबईत सर्व जातीचे आंबे येत आहेत, असे मुंबईतील आंबा व्यापारी जय गुप्ता यांनी सांगितले.
पाच डझनच्या पेटीसाठी पाच हजार रुपये
दर्जानुसार हापूस आंब्याचे दर ४-५ डझनच्या पेटीसाठी साधारण ४,००० ते ५,००० रुपयांदरम्यान आहेत. उच्च प्रतीच्या देवगड आणि रत्नागिरी हापूससाठी ग्राहकांना ५,०००-६,००० आणि रत्नागिरी पिंजरा, पायरी आणि मध्यम प्रतीच्या आंब्यांचे दर ३,५००-४,००० रुपयांपर्यंत (पेटी) आहेत, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.





