रत्नागिरी: सार्वजनिक रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम राबवत ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. चिपळूण, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी शहर परिसरात १६ एप्रिल रोजी पोलिसांनी ही कारवाई केली असून यामध्ये रिक्षा, दुचाकी आणि बोलेरो पिकअप सारख्या पाच वाहनांचा समावेश आहे.
चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर कोकणदीप सुपर मार्केटसमोर आपली मॅक्झिमा रिक्षा (क्र. MH 08 BC 1936) मुंबईच्या दिशेला तोंड करून आणि रहदारीला अडथळा होईल अशा स्थितीत सोडून निघून गेलेल्या दत्ताराम नारायण शिंदे या चालकावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अशाच प्रकारची कारवाई लांजा येथेही करण्यात आली असून, मुंबई-गोवा महामार्गावर न्यू इंग्लिश स्कूलच्या बाहेर आपली स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्र. MH 08 BD 7067) लोकांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने उभी केल्याबद्दल संतोष नारायण झोरे याच्यावर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राजापूर शहरातही वाहतुकीची शिस्त बिघडवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे सत्र सुरू असून जवाहर चौक ते गणेशघाट मार्गावरील शिवपार्वती हॉटेलसमोर आपली रिक्षा (क्र. MH 08 BC 3772) आडवी उभी करणाऱ्या राहुल यशवंत सोगम या तरुणावर राजापूर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.
रत्नागिरी शहरात चर्मालय चौक येथे कोकणनगरकडे जाणाऱ्या मार्गावर महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH 08 AP 3767) उभी करून वाहतुकीची कोंडी करणाऱ्या संदीप प्रकाश लाड या चालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच रत्नागिरी ते हातखंबा मार्गावर खेडशी गयाळवाडी येथील सर्विस रोडवर आपली मारुती सुझुकी झेन गाडी (क्र. MH 08 AX 0191) पादचाऱ्यांच्या रहदारीला अडथळा होईल अशा स्थितीत उभी केल्याप्रकरणी संदीप बबन फोडे याच्यावरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
या सर्व कारवायांमध्ये पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम २८५ नुसार गुन्हे नोंदवले असून, सार्वजनिक रस्त्यांवर नियमांचे उल्लंघन करून वाहने उभी करणाऱ्यांना हा कडक इशारा देण्यात आला आहे. महामार्गावरील वाढते अपघात आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.






