रत्नागिरी: शहराचे प्रमुख पर्यटन केंद्र आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ले रत्नदुर्ग तसेच भगवती बंदर परिसरात वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात पर्यटकांच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक छापा टाकून दणका दिला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत त्यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
रत्नदुर्ग किल्ल्यावर आणि भगवती बंदर परिसरात सायंकाळच्या वेळी सहलीसाठी येणाऱ्या कुटुंबांना मद्यपींच्या त्रासामुळे मनस्ताप सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी यासंदर्भात तक्रारी केल्यानंतर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी ही मोहीम राबवली. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक तानाजी पवार, उपनिरीक्षक सिद्धी सावंत, सागर वाळुंजकर आणि त्यांच्या पथकाने परिसरात धिंगाणा घालणाऱ्यांवर कायदेशीर बडगा उगारला. ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य राखणे हे सर्वांचे कर्तव्य असून अशा समाजकंटकांमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला बाधा येत असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी यावेळी नमूद केले.
पोल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही कारवाई केवळ एक दिवसापुरती मर्यादित नसून यापुढे पेठ आणि किल्ला परिसरात नियमित गस्त वाढवण्यात येणार आहे. पोलिसांच्या या कठोर पावलामुळे मद्यपींचे धाबे दणाणले असून स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणाऱ्यांवर आणि अवैध कृत्य करणाऱ्यांवर कोणतीही गय न करता कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या मोहिमेमुळे आता हा परिसर पुन्हा एकदा सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






