रत्नागिरी : तालुक्यातील चाटवळवाडी देउड येथे घराची खिडकी उघडून आत शिरलेल्या एका चोरट्याने अडीच हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाटवळवाडी देउड येथील रहिवासी अनंत बाळू गोणबरे (वय ५५) यांच्या घरी २८ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास ही घरफोडी झाली. पहाटे २:३० ते ३:३० च्या दरम्यान चोरट्याने घराच्या बाथरूमची खिडकी उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर किचनमधील कपाटात कागदी पाकिटात ठेवलेले २५०० रुपये चोरून नेले. सकाळी चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर गोणबरे यांनी तत्काळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीवरून पोलिसांनी सिद्धेश पांडुरंग आंबेरकर (वय ३०, रा. खारवीवाडा सितापेवाडी, पेट पूर्णगड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३३१ (४) आणि ३०५ (अ) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. भरवस्तीत अशा प्रकारे चोरी झाल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.







