GRAMIN SEARCH BANNER

आरे-वारे येथे पर्यटक कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
3 Views

रत्नागिरी : आरे-वारे परिसरात फिरण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका कुटुंबावर चार अनोळखी इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण हरीश्चंद्र कोरे (वय ४८, रा. दहिसर पश्चिम, मुंबई) हे आपल्या कुटुंबासह रत्नागिरी येथे पर्यटनासाठी आले होते. २ मे रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास आरे-वारे येथे असताना दोन गाड्यांमधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांच्या वाहनासमोर वाकडी-तिकडी गाडी चालवत अडथळा निर्माण केला. त्यानंतर त्यांनी कोरे यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

याबाबत जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या आरोपींनी प्रविण कोरे यांच्यावर हाताने मारहाण करत त्यांच्या डोक्याला, कानाला व हाताला दुखापत केली. तसेच त्यांच्या पत्नी स्नेहल यांना धक्काबुक्की करण्यात आली. याचवेळी एका आरोपीने धारदार शस्त्र काढून मारण्यासाठी धाव घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या झटापटीत कोरे यांचे भाऊ गिरीष यांच्या हाताला दुखापत झाली असून पुतण्या सार्थक यालाही मार लागला आहे.

घटनेदरम्यान गोंधळात कोरे यांच्या गळ्यातील सुमारे सहा ग्रॅम सोन्याची चैन व त्यामधील चांदीची अंगठी हरवली असल्याची नोंद आहे. मारहाणीनंतर आरोपींनी त्यांच्या गाडीचा काही अंतरापर्यंत पाठलाग करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणी भारतीय दंड संहिता २०२३ मधील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Total Visitor Counter

3351775
Share This Article