रत्नागिरी: रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर व्हावा या उद्देशाने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) वतीने विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. ‘सुरक्षा ही जबाबदार कृतीतून सुरू होते’ हा संदेश देत आरपीएफच्या पथकाने प्रवाशांना रेल्वे नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
या मोहिमेदरम्यान प्रामुख्याने रेल्वे रूळ ओलांडणे, धावत्या गाडीच्या पायरीवर उभे राहून प्रवास करणे यांसारख्या जीवघेण्या सवयींपासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्थानक परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ प्रशासनाला सूचित करण्याबाबत प्रवाशांना सतर्क करण्यात आले. प्रवाशांमध्ये सुरक्षिततेविषयी अधिक स्पष्टता निर्माण व्हावी यासाठी माहितीपत्रकांचे वाटपही यावेळी करण्यात आले. रेल्वे प्रवासादरम्यान घ्यावयाची खबरदारी आणि सतर्कता यामुळे अपघात टाळता येणे शक्य असून, नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या मोहिमेद्वारे करण्यात आले आहे.






