GRAMIN SEARCH BANNER

छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देवरुखमध्ये संपन्न

Gramin Varta
7 Views

‘गावचा विकास नेत्यांच्या ओळखीने नाही, तर तरुणांच्या संघर्षातूनच शक्य – सुहास खंडागळे

देवरुख:गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा आयोजित अत्यंत लोकप्रिय अशा ‘छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा २०२५’ चा बक्षीस वितरण समारंभ २० मे रोजी देवरुख येथील कार्यक्रमात उत्साहात संपन्न झाला. जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक व सामाजिक प्रश्नांवर विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले, तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व विजेत्यांचे जाहीर अभिनंदन केले.

दरवर्षी गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, संघटन प्रमुख सुहास खंडागळे, उपाध्यक्ष राहुल यादव, सुरेंद्र काबदुले,उपाध्यक्ष मंगेश धावडे, सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे,मुझमिल काझी आणि जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले जाते.

जिल्ह्यातील तरुणांना आपल्या भागातील विविध आव्हानांवर आणि प्रश्नांवर लिखाण करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी ‘जिल्ह्यातील आरोग्य सुविधा: सद्यस्थिती, आव्हाने आणि अपेक्षा’, ‘रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाची माझी कल्पना: २०३० चा रत्नागिरी जिल्हा’ आणि ‘आंबा-काजूच्या पलीकडे: रत्नागिरीतील कृषी विकास का झाला नाही’ असे अत्यंत अभ्यासपूर्ण व संवेदनशील विषय महाविद्यालयीन खुल्या गटासाठी ठेवण्यात आले होते.

या बक्षीस वितरण समारंभात बोलताना गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे   म्हणाले की, “नेते तुमच्या ओळखीचे आहेत म्हणून तुमच्या गावांचा विकास होणार नाही, तर आपल्या गावांचा विकास साधण्यासाठी आपल्याला स्वतःला संघर्ष करावा लागणार आहे. गावांचा सर्वांगीण विकास सोडून राजकीय दिखावेगिरीच्या मागे धावणाऱ्या तरुणांबाबत खंडागळे यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. आपल्या तरुणांनी विकासाबाबत प्रश्न विचारायला हवेत असेही खंडागळे म्हणाले.जिल्ह्यातील विविध प्रश्नांची जाण रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांना व्हावी आणि त्या विषयांवर त्यांनी आपली सडेतोड मते व्यक्त करावीत, यासाठीच दरवर्षी ही स्पर्धा वेगवेगळ्या विषयांवर आयोजित केली जाते.यावेळी स्पर्धकांनीही आपले मनोगत व्यक्त करत समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावणाऱ्या परीक्षित  चंद्रकांत दाभोळकर या विजेत्याने सांगितले की, ही स्पर्धा कोकणातील तरुणांना आपले प्रगल्भ विचार मांडण्यासाठी एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. तर उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणारे स्पर्धक तेजस कासार यांनी निबंधाच्या विषयाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले, “कोकणातील शेती ही आता आंबा-काजूच्या पलीकडे जायला हवी; परंतु त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने येथे शेतीचा विकास रखडला आहे. संघटनेने यंदा अतिशय योग्य आणि उत्तम विषयांची निवड केली होती.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वरूप मिलिंद काणे (पोमेंडी)रत्नागिरी,
द्वितीय क्रमांक परिक्षीत चंद्रकांत दाभोळकर सावर्डे यांनी प्राप्त केला .

उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते
१. तेजस प्रदिप कासार. मुंढे – तळसर
2. तन्वी चंद्रशेखर सुर्वे. पाली
3. वैष्णवी गजानन हळदे. देवखेरकी रामपूर
प्रथम पारितोषिक विजेत्यास ₹ ५००१/- , द्वितीय क्रमांकास ₹ ३००१/- आणि उत्तेजनार्थ पाच विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आले.

२०२६ च्या स्पर्धेची घोषणा लवकरच
दरम्यान, आयोजकांतर्फे सांगण्यात आले की आगामी २०२६ च्या निबंध स्पर्धेची घोषणा लवकरच केली जाईल.
देवरुख येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे, एडव्होकेट सुनील खंडागळे, संगमेश्वर तालुका खंडागळे, पूजा घुग यांसह पदाधिकारी आणि स्पर्धक उपस्थित होते.

Total Visitor Counter

3484459
Share This Article