चिपळूण: तालुक्यातील खांडोत्री येथील ओबीसी बांधवांनी शासनाच्या जनगणनेला तीव्र विरोध दर्शवला असून, जोपर्यंत ‘ओबीसी’ प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना (कॉलम) दिला जात नाही, तोपर्यंत जनगणनेची कोणतीही माहिती न देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे माहिती गोळा करण्यासाठी गावात आलेल्या प्रगणक, पर्यवेक्षक आणि मंडळ अधिकाऱ्यांना अखेर रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले आहे.
शासनाकडून केल्या जाणाऱ्या जनगणनेच्या अर्जामध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना नसल्याने संपूर्ण समाजात सध्या तीव्र असंतोष पसरला आहे. याच पार्श्वभूमीवर खांडोत्री गावातील ओबीसी बांधव एकत्र आले आणि त्यांनी आपल्या हक्काच्या स्वतंत्र रकान्यासाठी जनगणनेच्या कामावर थेट बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. प्रशासकीय अधिकारी गावात दाखल होताच गावकऱ्यांनी त्यांना माहिती देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. आपल्या हक्कासाठी प्रशासनाला माघारी धाडणाऱ्या या निर्णयामुळे परिसरात सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
या संपूर्ण निर्णय प्रक्रियेत आणि आंदोलनात खांडोत्री गावातील अनेक प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये सरपंच सौ. सोनम घाणेकर, उपसरपंच श्री. अमोल अनंत कोदारे, माजी सरपंच श्री. सखाराम सुवरे आणि कुणबी विकास मंडळ (वहाळ, मुंबई) चे अध्यक्ष श्री. अनंत कोदारे यांनी मुख्य पुढाकार घेतला.
यावेळी श्री. दशरथ मेस्त्री, श्री. विष्णू कारेकर, श्री. शंकर जड्यार, श्री. सोमा सुवरे, श्री. सुनिल बाईत, श्री. अनंत सुवरे, श्री. जयराम सुवरे, श्री. संदीप सुवरे, श्री. मारुती कोदारे, श्री. महादेव घाणेकर, श्री. सुरेश सुर्वे, श्री. आत्माराम कातकर, श्री. शेखर गांधी, श्री. सुभाष घाणेकर, श्री. रामचंद्र सुवरे, श्री. सुरेश खांबे, श्री. दत्ताराम मेस्त्री, श्री. दौलत सुवरे आणि श्री. नंदकुमार सुवरे यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. जोपर्यंत ओबीसी प्रवर्गाचा स्वतंत्र रकाना अर्जात समाविष्ट केला जात नाही, तोपर्यंत हा विरोध असाच सुरू राहील, असा इशाराही यावेळी समस्त गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.







