रत्नागिरी: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावातील शिवश्री सागर शिवाजी कळंबटे यांनी एलएलबी (LLB) ही वकिलीची परीक्षा उत्तीर्ण करून एक आदर्शवत यश संपादन केले आहे. कुणबी समाजातून मिरजोळे गावातून वकील होणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
कै. शिवाजी कळंबटे यांचे सुपुत्र असलेले सागर कळंबटे हे मिरजोळे गावचे माजी उपसरपंच म्हणूनही परिचित आहेत. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असून, ते ह्युमन राईट्स फॉर प्रोटेक्शन (मानवाधिकार समिती) रत्नागिरी तालुका व जिल्ह्याचे सचिव तसेच कुणबी समाजोन्नती संघ, तालुका रत्नागिरीचे युवा नेतृत्व म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. परिवर्तनवादी विचारांचे पाईक म्हणून त्यांची ओळख आहे.
घरची परिस्थिती बेताची असतानाही, सागर कळंबटे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर हे यश मिळवले आहे. आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करण्यासोबतच त्यांनी गावाचेही नाव रोशन केले आहे. त्यांचे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
या यशाबद्दल सागर कळंबटे यांच्या आई, पत्नी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांचे लोकनेते शामरावजी पेजे परिवार, रत्नागिरी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शिवमय शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.