नवी दिल्ली: देशात चलनाचा रेकॉर्ड ब्रेक साठा असूनही सामान्य नागरिकांना मात्र एटीएममधून पैसे काढताना त्रास हाेत आहे. अनेक राज्यांमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण व अर्ध-शहरी भागांतील एटीएममध्ये पैशांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने भारतीय बँक संघ (आयबीए) आणि आरबीआयला पत्र लिहून एटीएम सेवा विस्कळीत होण्याचा इशारा दिला आहे.
मागणी-पुरवठ्यात तफावत
एटीएम ऑपरेटर्सनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च आणि एप्रिल महिन्यांत देशभरातील एटीएमसाठी सुमारे ९४,००० कोटी रुपयांची आवश्यकता होती. बँकांकडून मार्चमध्ये केवळ ६१,००० कोटी आणि एप्रिलमध्ये फक्त ५४,००० कोटी रुपये उपलब्ध होऊ शकले.
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या रोकड टंचाईचा मोठा फटका बसत आहे. ऐन पेरणीच्या काळात खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज असते, मात्र बँकांच्या एटीएममध्ये पैसे नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रोकड टंचाईची मुख्य कारणे
करन्सी चेस्टमधून कमी पुरवठा : बँकांच्या शाखा आणि मुख्य करन्सी चेस्टमधून एटीएम ऑपरेटर्सना पुरेशा नोटा दिल्या जात नसल्याचा दावा कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने केला आहे.
वाढता परिचालन खर्च : इंधन दरवाढ आणि कडक सुरक्षा नियमांमुळे एटीएम व्यवस्थापनाचा खर्च वाढला आहे.
मोठ्या नोटांचा तुटवडा : अनेक ठिकाणी ५०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा असल्याने मशीन लवकर रिकाम्या होत आहेत.
पर्याय काय? : एटीएम बंद असल्यास नागरिकांनी वेळेवर व्यवहार पूर्ण करण्यासाठी यूपीआयचा वापर करावा. रोख रकमेसाठी मुख्य बँक शाखांशी जोडलेल्या एटीएमवर जावे किंवा स्थानिक किराणा दुकानांमधील मायक्रो-एटीएमचा आधार घ्या.







