ग्रामीण वार्तासह कनिष्ठ अभियंता अक्षय बोरसे यांचे वाहनचालकांनी मानले आभार!
कुरधुंडा गावचे माजी सरपंच जमुरत भाई अलजी,विद्यमान उपसरपंच तैमूर अलजी यांनी घटनेची माहिती ग्रामीण वार्ताला दिली होती
देवरुख: रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्याने करंबेळे-देवरुख रस्त्यावर काही वेळेपूर्वी एक भलेमोठे झाड उन्मळून पडले होते. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मात्र, ‘ग्रामीण वार्ता’ला या घटनेची माहिती मिळताच वृत्त प्रसारित केले होते . याची दखल घेत प्रशासनाने अवघ्या काही वेळेस हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या तत्पर कार्यवाहीबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. अक्षय बोरसे यांचे वाहनचालकांनी विशेष आभार मानले आहेत.
कुरधुंडा येथील माजी सरपंच जमुरत भाई अलजी आणि विद्यमान उपसरपंच तैमूर अलजी यांनी ग्रामीण वार्ताला घटनेची माहिती दिली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युद्धपातळीवर झाड हटवण्याचे काम सुरू केले.
या घटनेची माहिती मिळताच, प्रशासनाने तातडीने पावले उचलली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. बोरसे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही तासांच्या अथक परिश्रमानंतर रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. श्री. बोरसे यांच्या या तत्पर आणि प्रभावी कामामुळेच अनेक प्रवाशांचा त्रास वाचला, ज्यामुळे वाहनचालकांनी त्यांचे आभार मानले.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पूरप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे. सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.