राजापूर: वाटूळ गावचे सुपुत्र, साहित्य, समाज आणि शिक्षण क्षेत्रात तळमळीने कार्य करणारे युवा कवी व साहित्यिक विराज चव्हाण यांना कोकण दीप मासिकातर्फे दिला जाणारा ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
कविता, लेखन, सामाजिक प्रबोधन आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विराज चव्हाण यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्न, सांस्कृतिक जडणघडण आणि मानवी मूल्ये यांचे प्रभावी चित्रण त्यांच्या साहित्यकृतींमधून दिसून येते. तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी समाजसेवेची परंपरा जपली आहे.
साहित्य क्षेत्रातील योगदानाबरोबरच युवकांना वाचन, लेखन आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत कोकण दीप मासिकाने त्यांची यंदाच्या ‘कोकण रत्न’ पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या पुरस्काराबद्दल विविध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे वाटूळ गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

