रत्नागिरी : शहरातील अभ्युदयनगर येथील आधार बेघर निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या ६२ वर्षीय दिलीप रामचंद्र भोसले यांचा उपचारादरम्यान १७ जून रोजी सायंकाळी ५.३५ वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. भोसले यांना अनेक वर्षांपासून अर्धांगवायूचा त्रास होता. या घटनेची माहिती सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. शिवानी संदीप पवार (वय ३९, रा. शिवाजीनगर, सुर्वे चाळ, रत्नागिरी), ज्या आधार बेघर निवारा केंद्रात बेघर लोकांची देखभाल करतात, यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये पावसाळ्यात दिलीप रामचंद्र भोसले यांचे घर कोसळले होते. त्यामुळे ते बेघर झाले होते आणि त्यांना त्यांच्या बहिणीसह नातेवाईकांनी आधार बेघर निवारा केंद्रात दाखल केले होते.
दिलीप भोसले यांना आधीपासूनच अर्धांगवायूचा त्रास होता. १० मे रोजी त्यांना त्रास अधिक वाढल्याने तात्काळ रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. २६ मे रोजी त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता आणि ते पुन्हा निवारा केंद्रात परतले होते.
काल, १७ जून रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास, त्यांची बहीण त्यांना जेवण्यासाठी उठवण्यासाठी गेली असता, त्यांच्यात कोणतीही हालचाल आढळली नाही. त्यानंतर, निवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, सायंकाळी ५.३५ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी अभ्युदयनगर येथील बेघर निवारा केंद्रातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Comment
Leave a Comment