रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील सत्कोंडी आणि कांबळेलावगण येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांनी आता सौर ऊर्जेचा वापर करून वीज बिलांची मोठी बचत करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका पुरस्कृत ‘पंचम एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पा’अंतर्गत या दोन्ही शाळांमध्ये ८ किलोवॅटचा सौर प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे या शाळा जिल्ह्यातील अशा पहिल्याच शाळा ठरल्या आहेत, ज्या पर्यावरणपूरक सौर ऊर्जा निर्माण करून महावितरणलाही वीज पुरवठा करत आहेत.
महाराष्ट्र फाउंडेशनच्या सहाय्याने सत्कोंडी गावात ‘पंचम एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प’ राबवण्यात येत असून, ‘हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी’ ही संस्था यासाठी समन्वय संस्था म्हणून कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि गरिबी निर्मूलन अशा पाच महत्त्वाच्या विषयांवर हा प्रकल्प काम करत आहे. पर्यावरणपूरक ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या प्रकल्पांतर्गत गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना तब्बल साडेपाच लाख रुपयांचे सौर पॅनल बसवून सौरऊर्जा कार्यान्वित करण्यात आली आहे.
या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सत्कोंडीमधील थोर समाजनेते स्व. अनंतराव बैकर बहुउद्देशीय संकुलातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रुपग्रामपंचायत कार्यालय, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, अंगणवाडी, महिला उद्योग प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा आणि वॉटर एटीएम या सर्व आस्थापनांना सौर ऊर्जा पुरवठा सुरू झाला आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही शाळांचे वीज बिल शून्य येणार असून, दोन्ही शाळा आणि इतर आस्थापनांची मिळून वर्षाला सुमारे २ लाख रुपयांची बचत होणार आहे.
या दोन्ही सौर शाळांचे उद्घाटन महाराष्ट्र फाउंडेशनच्या संचालिका रेश्मा सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी दत्ता गुरव, चेतन वाघ, संतोष कांबळे, सत्कोंडीचे सरपंच सतीश थूल, उपसरपंच चंद्रकांत मालप, तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. सत्कोंडीतील सौर प्रकल्पात वर्षाला ७,००० युनिट्स वीज निर्माण होणार आहे, तर कांबळेलावगणमध्ये वर्षाला ४,५०० युनिट्स वीजनिर्मिती अपेक्षित असून, यातून प्राथमिक शाळा, अंगणवाडी, वॉटर एटीएम आणि बोअरवेल यांना सौर ऊर्जा पुरवली जात आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील शाळांसाठी एक आदर्श निर्माण झाला असून, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर ऊर्जा वापरासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.