वादळी वाऱ्याच्या स्थिती अधिकारी, कर्मचारी गायब
रत्नागिरी :गेले काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांना सतर्क राहण्यासाठी हवामान खात्याकडून सूचना देण्यात येतात. अलर्ट केले जाते. मात्र एवढी परिस्थिती असताना भारतीय हवामान शास्त्र विभाग रत्नागिरीतील नाचणे येथे कार्यरत हवामान केंद्राला भर दुपारी टाळे असल्याचे दिसून आले. सोमवारी दुपारी 1 वाजता हवामान केंद्राच्या कार्यालयाला कुलूप ठोकून येथील सर्वच कर्मचारी गायब होत असल्यामुळे हवामान विभाग रामभरोसे झाला आहे. लाखो रुपये खर्च करून येथे यंत्रसामुग्री उभारण्यात आली आहे. तर अधिकाऱ्यांसह येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतानाही कार्यालय बंद करून कर्मचारी गायब होत आहेत.
या कार्यालयाच्या इमारतीच्या बाजुला स्वयंचलित मौसम स्टेशन कार्यान्वित आहे. तर हवामानाची स्थिती दर्शवणारी यंत्रणा इमारतीच्या टेरेसवर बसविण्यात आले आहे. हवामानाच्या बदलत्या नोंदी ठेवण्यासाठी रत्नागिरीत या विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईतील कुलाबा येथील हवामान केंद्राच्या अखत्यारीत या केंद्राचे कामकाज चालते. हवामान केंद्राच्या आवारातच अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. कार्यालय पूर्ण बंद न ठेवता दुपारी दोन ते अडीच या वेळेत टप्प्याटप्प्यात जेवण करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. तरीही कार्यालयाला कुलूप ठोकून सर्वचजण गायब होत असल्यामुळे हवामान विभाग रामभरोसे झाला आहे.