GRAMIN SEARCH BANNER

आमदार भास्कर जाधव यांच्या सूचक स्टेटसने राजकीय खळबळ: निवृत्तीचे संकेत की नवीन राजकीय दिशा?

Gramin Search
18 Views

चिपळूण (प्रतिनिधी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने कोकणातील तसेच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्टपणे पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी न मिळण्याची खंत व्यक्त केली होती. त्याचवेळी त्यांनी “माझी शेवटची इच्छा आहे की विरोधी पक्षनेतेपदाचा दरारा महाराष्ट्राला दाखवावा” असे वक्तव्य करत आपल्या पुढील राजकीय दिशा व भूमिकेचाही संकेत दिला होता.

याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी ठेवलेले व्हॉट्सॲप स्टेटस सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यांनी लिहिलेल्या स्टेटसमधून त्यांची व्यथा, नाराजी आणि अंतर्गत ताण स्पष्टपणे व्यक्त होत असल्याचे दिसत आहे. “दीपक को घी तब चाहिए जब वो जल रहा हो… बुझने के बाद घी डालना व्यर्थ है… उसी प्रकार इंसान की कदर समय रहते कर लिजिये… वक्त जाने पर अफसोस करना व्यर्थ है… सब साथ है, फिर भी एक खालीपन सा है… रिश्तों में आज कल दिखावे का अपनापन सा है…” असे हे सूचक स्टेटस आहे.

या भावनिक स्टेटसवरून जाधव यांची मनःस्थिती आणि पक्षातील स्थानाबाबतचा संभ्रम अधोरेखित होतो. “सर्वजण साथ आहेत, तरीही एक शून्यता आहे” – हे वाक्य विशेषतः पक्षात अंदाजे दुर्लक्षित वाटण्याच्या भावनेशी जोडले जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जाधव यांची पक्ष नेतृत्वावर नाराजी वेळोवेळी स्पष्ट झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या राजकीय घडामोडी असोत, किंवा कोकणातील जिल्हा नियोजनाच्या भूमिका – जाधव यांची स्थिती सध्या अस्पष्ट आणि अस्वस्थतेत असल्याचं अनेक निरीक्षकांचे मत आहे.

ज्येष्ठता, अनुभव आणि भाषाशैली यामुळे भास्कर जाधव हे पक्षातील ठळक चेहरे असूनही त्यांना आजवर वरिष्ठ भूमिका दिल्या गेल्या नाहीत, ही खंत त्यांनी याआधीही खासगी बोलण्यात व्यक्त केली होती. राजकीय वर्तुळात आता या सूचक स्टेटसचा भावी राजकीय हालचालींशी संबंध जोडला जात आहे. भास्कर जाधव यांचा पुढचा निर्णय, पक्षातील अंतर्गत गटबाजीवर भाष्य, किंवा दुसऱ्या पर्यायांकडे होणारी वाटचाल – हे सारे प्रश्न आता नव्याने चर्चेत आले आहेत.

Total Visitor Counter

2651882
Share This Article