संगमेश्वर/ एजाज पटेल: उन्हातान्हात अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या आणि संकटांशी सामना करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १९९४ च्या बॅचच्या पोलीस बांधवांचे एक आगळेवेगळे स्नेहसंमेलन नुकतेच नरबे येथील सुरभी ऍग्रो रिसॉर्ट येथे उत्साहात आणि तितक्याच भावूक वातावरणात पार पडले. २३ जून १९९४ रोजी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून एकत्र कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या सहकाऱ्यांच्या खाकी वर्दीतील ३२ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला या निमित्ताने उजाळा देण्यात आला. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वर्दीतील कडक शिस्त बाजूला ठेवून येथे केवळ निखळ मैत्रीचे दर्शन घडले. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या या जिवलग मित्रांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले, तर जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचा कंठ दाटून आला.
पोलीस दलातील खडतर प्रशिक्षण, सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि सेवा बजावताना वाट्याला आलेले अनुभव एकमेकांना सांगताना या मित्रांनी पुन्हा एकदा ३२ वर्षांपूर्वीच्या त्याच तरुणपणीच्या दिवसांत प्रवेश केला. २३ जून १९९४ रोजी भरती झालेले हे शिलेदार आज अनुभवाच्या शिदोरीसह राज्यातील विविध जिल्ह्यांत उच्च पदांवर कार्यरत असूनही, त्यांच्यातील मैत्रीचा ओलावा आजही तितकाच घट्ट असल्याचे दिसून आले. अविरत सेवाकाळात विखुरलेले हे सहकारी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र आले आणि या स्नेहसंमेलनाचे नियोजन यशस्वी केले.
या ऐतिहासिक भेटीत दीपू साळवी, जीवन जाधव, विनायक जाधव, किशोर जोशी, सचिन घाग, संदीप कोळंबेकर, महेश मुरकर, अवधूत सुर्वे, गणेश कादवडकर, राजा सावंत, संजय साळवी, मनोज पावसकर, राजेंद्र माने, काशिनाथ रामपुरकर, संदेश चव्हाण, नरेंद्र जाधव, अशोक गायकवाड, अशोक रावनांग, विनायक चव्हाण, संजय बंडबे, जितेंद्र पालांडे, प्रकाश पवार, संदेश यादव आणि संजय मारळकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सततच्या तणावाच्या वातावरणातून काही काळ मुक्त होऊन आपल्या जुन्या सवंगड्यांसोबत मनमोकळा संवाद साधणाऱ्या या पोलीस बांधवांच्या या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
