रत्नागिरी: आंबा उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून, त्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी उद्या, २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या माध्यमातून हे आंदोलन पुकारण्यात येणार असून, यासंदर्भात संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी यांनी माहिती दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे फळपीक उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. २०१५ सालापासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांना अद्याप अपेक्षित मदत मिळालेली नाही. चालू हंगामातही नैसर्गिक अनियमिततेमुळे केवळ २० टक्केच उत्पन्न हाती आले आहे. या पार्श्वभूमीवर, सरसकट कर्जमाफी करून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पाच लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. कोणत्याही जाचक अटी न लावता सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करावा, अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या नियोजनाच्या वेळी दीपक उपळेकर, अशोक भाटकर, सदाशिव पाचकुडे व राजुशेठ रामगडे उपस्थित होते.
