GRAMIN SEARCH BANNER

रायगड: पाकिस्तानी बोट अन् 600 पोलिसांनी जिल्हा काढला पिंजून, समोर आली धक्कादायक माहिती

Gramin Search
28 Views

रायगड: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व व्यवहार, व्यापार बंद केलेला आहे.

तसेच पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांत येण्यास मनाई केली आहे. असे असतानाच रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील समुद्रकिनार्‍यावर संशयास्पद प्रकार समोर आला आहे. येथे रात्रीच्या अंधारात संशयास्पद बोट आढळली (बोटीचा काही भाग) आणि ती पुन्हा गायब झाली आहे. दरम्यान, आता याच बोटीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर सर्वच यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या अलिबाग रेवदंडाजवळ असलेल्या कोर्लई किल्ला येथे रडारवर नौदलाला एक बोट (बोटीचा काही भाग) दिसली रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर अचानक अनोळखी जहाज असल्याचे समजले होते. ही माहितीरात्रीपासून कोस्टगार्डलाही मिळाली होती. मात्र ही बोट आज (7 जुलै) सकाळपासून शोधण्यात येत आहे. पण ती आता रडारवर दिसत नाहीये.

हेलिकॉप्टरच्या मदतीने घेतला शोध

हा प्रकार समोर आल्यानंतर रायगड पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. त्यांनाही संबंधित संशयित बोट दिसलेली नाही. बोट खोल समुद्रात असल्याची माहिती मिळाली होती.आज सकाळी पासून पुन्हा या बोटीला शोधण्याचं काम सुरू होतं. हेलिकॉप्टरच्या मदतीनेदेखील या बोटीचा शोध घेण्यात आला.

मुकद्दर बोया 99 बोट पाकिस्तानमधीलच

आता तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नौदलाच्या रडारवर दिसलेली ती बोट पाकिस्तानमधील होती. मुकद्दर बोया 99 असे या मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाकिस्तानी बोटीचे नाव आहे. ही बोट वादळामुळे पाकिस्तानच्या समुद्रकिनाऱ्याहून भारतीय हद्दीत आली होती, असा नौदलाला संशय आहे. संशयित बोट आढळताच संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्च ऑपरेशन करण्यात आले आहे.

600 पोलिसांनी रायगड जिल्हा पिंजून काढला

होटल, लॉज, रिसॉर्ट आणि इतर ठिकाणीही यंत्रणांनी झाडाझडती घेतली आहे. तर मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीचा बोया आणि त्याच्यासोबत ट्रांसपोंडर्स वाऱ्यामुळे वाहून आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही बोट भारतीय हद्दीत दिसताच यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. 52 अधिकारी आणि 600 पोलिसांनी संपूर्ण रायगड जिल्हा पिंजून काढला आहे.

चौकशीतून नेमकं काय समोर आलं?

या तपासानंतर रायगडच्या पोलिसांनीही मोठी आणि महत्वाची माहिती दिली आहे. रेवदंडा समुद्रकिनाऱ्यात जे आढळलं होतं तो बोटीचा केवळ एक छोटा भाग होता. सबंधित बोट ही पाकिस्तानच्या कराचीमध्येच आहे. मासेमारी बोटीचा बोया असल्याने त्याला जीपीएस ट्रॅकर आहे. या ट्रॅकरमुळेच भारतीय नौदलाने बोटीची ओळख पटवली आहे. मात्र मूळ बोट पाकिस्तानात असून बोटीचा काही अवशेष भारतात वाहून आल्याचं निष्पन्न झालं आहे. खबरदारी म्हणून पोलिसानी रायगड जिल्हा पिंजून काढला मात्र काळजी करण्यासारखे कारण नाही, रायगडच्या पोलिसांनी सांगितले आहे.

Total Visitor Counter

3207556
Share This Article