रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील अकबर मोहल्ल्यात सैय्यद फकरुद्दीन बाबांचा वार्षिक हुर्स बुधवार, दि. ९ जुलै रोजी अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि शांततेच्या वातावरणात संपन्न झाला.
या पवित्र कार्यक्रमाची सुरुवात सकाळी कुरआन पठणाने झाली. परिसरातील श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला. दुपारी ४.३० वाजता हासन मुसा गडबडे यांच्या घरून संदल शरीफ आणि गीलाफ सैय्यद फकरुद्दीन बाबांच्या दर्गा शरीफकडे नेण्यात आले. संपूर्ण मिरवणूक कोणतेही वाद्य न वाजवता अत्यंत शांततेत पार पडली.
दर्ग्यात पोहोचल्यानंतर बाबांच्या पवित्र मजारवर दरूद पठण करून गीलाफ चढवण्यात आला. त्यानंतर ग्यारहवीं शरीफचे विशेष पठण करण्यात आले. हा धार्मिक कार्यक्रम आकबर मोहल्ला उपाध्यक्ष मा. श्री. अब्दुल रेहमान अ. लतीफ संसारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या पावन प्रसंगी दरग्याचे मुजावर मा. श्री. आशरफ अली गडबडे आणि मा. श्री. खुदबुद्दीन अबू गडबडे यांची विशेष उपस्थिती लाभली. जयगड गावातील सर्व मोल्ला प्रमुख, ग्रामस्थ आणि भाविकांनी भक्तिभावाने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याची शोभा वाढवली.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, श्रद्धायुक्त आणि शांततेच्या वातावरणात पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.