तालुक्यातील अनेक गावात हीच स्थिती..
राजन लाड / जैतापूर
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान अंतर्गत साखरीनाटे ग्रामपंचायतीमध्ये स्थापन करण्यात आलेली तंटामुक्त समिती आज पूर्णपणे निष्क्रिय स्थितीत आहे. स्थापनेपासून एकही अधिकृत सभा झालेली नाही, कोणताही ठोस निर्णय झाल्याचे नोंद नाही, आणि गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याची पद्धतही अस्तित्वात नाही.
गावकऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “ही समिती केवळ नावापुरती आहे, प्रत्यक्षात काहीही काम होत नाही, वाद मिटवण्यासाठी आम्ही कुणाकडे जावं?” असा प्रश्न विचारला आहे.
योजना चांगली, पण अंमलबजावणी फसलेली
समिती स्थापनेच्या वेळी थोडीफार हालचाल झाली होती. मात्र पुढे “आमच्याकडे कोणतेच स्पष्ट अधिकार नाहीत” असा सूर अनेक सदस्यांकडून ऐकायला मिळाला. त्यामुळे आज समितीकडे कुणी तक्रार करतच नाही.
केवळ काही ठराविक वादांवरच चर्चा होते, तीही अनौपचारिक. लेखी निर्णय, इतिवृत्त, ठोस निकाल अशा कोणत्याच गोष्टी प्रत्यक्षात झाल्या नाहीत.
राजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्येही अशीच स्थिती
साखरीनाटेसारखीच स्थिती राजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येते. तंटामुक्त समिती स्थापनेची नोंद आहे, पण सक्रिय सहभाग, बैठकांची नियमितता, ग्रामस्थांचा विश्वास आणि अंमलबजावणी या बाबी पूर्णतः हरवल्याचं चित्र दिसतं.
गावपातळीवर तंटा सोडवणार कोण?
गावात वाद झाल्यास नागरिक तंटामुक्त समितीऐवजी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक किंवा थेट पोलीस ठाण्याकडे तक्रार करत आहेत. काहीजण कोर्टाचा पर्यायही निवडतात, जे टाळण्यासाठीच ही समिती स्थापन करण्यात आली होती.
ग्रामस्थांचा थेट सवाल – ही समिती हवी तरी कशासाठी?
“आम्ही मतदान करून निवडून दिले, पण त्यांना ना अधिकार आहेत, ना बैठक, ना निर्णय. मग या समितीचा उपयोग तरी काय?” – एक ग्रामस्थ
प्रशासनाकडून त्वरित लक्ष द्यावे – ग्रामस्थांची मागणी
गावपातळीवरील तंटे शांतीपूर्ण मार्गाने मिटवण्यासाठी तंटामुक्त समित्यांचा हेतू चांगला आहे, पण त्यासाठी प्रशिक्षण, अधिकार, निधी आणि ग्रामसभेची जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता आहे, अशी जोरदार मागणी साखरीनाटे ग्रामस्थांकडून होत आहे.