सावंतवाडी : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाटातील महादेवगड पॉईंट येथे घडलेल्या एका दुर्दैवी दुर्घटनेत ४०० फूट खोल दरीत कोसळून पर्यटकाचा मृत्यू झाला. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी ही दुर्घटना घडल्यानंतर बुधवारी दुपारी सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीमने अथक प्रयत्नांनंतर त्यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आयुब सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसह वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे आले होते. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ते महादेवगड पॉईंट परिसरात असताना लघुशंकेसाठी सुरक्षेच्या रेलिंगच्या पलीकडे गेले. त्याचवेळी अचानक त्यांचा तोल जाऊन ते थेट सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळले.
घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या एका स्थानिक मका कणस विक्रेत्याने तात्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि आंबोली पोलीस ठाण्याचे संतोष गलोले हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम’ला तातडीने पाचारण करण्यात आले.
मात्र, संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधारामुळे मंगळवारी सायंकाळी सुरू करण्यात आलेली शोधमोहीम थांबवावी लागली. शिवाय, मृत पर्यटकाचा मोबाईल वरच राहिल्याने लोकेशनच्या आधारे शोध घेणेही शक्य झाले नाही.
बुधवारी पहाटे पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. सकाळी सुमारे दहा वाजता दरीत मृतदेह आढळून आला. त्यानंतर सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप आणि पोलिसांनी अत्यंत कठीण परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन राबवत दुपारी साडेबारा वाजता मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढला.
या मोहिमेत सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुपच्या स्वयंसेवकांनी मोठी भूमिका बजावत प्रतिकूल हवामानात जीवाची पर्वा न करता बचावकार्य पूर्ण केले. या दुर्दैवी घटनेमुळे आंबोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पर्यटनस्थळी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.





