रत्नागिरीत भोंदू महिलांनी मूल होण्यासाठी ‘विधी’च्या बहाण्याने गृहिणीचे सोन्याचे दागिने केले लंपास

Gramin Varta
388 Views

रत्नागिरी : अंधश्रद्धा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत दोन अज्ञात महिलांनी एका गृहिणीची तब्बल १ लाख ४४ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलांचा शोध सुरू आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान आरटीओ कार्यालयाजवळील मानस रेसिडेन्सी येथे ही घटना घडली. फिर्यादी सान्वी सुमित आंब्रे (वय ३०, रा. मानस रेसिडेन्सी, आरटीओ कार्यालयाजवळ, रत्नागिरी) यांच्याकडे पंजाबी ड्रेस परिधान केलेली एक महिला आणि साडी नेसलेली दुसरी महिला आल्या.

या महिलांनी फिर्यादीला मूल होण्यासाठी औषध तयार करून विधी करावा लागेल’ असे सांगत सोन्याचे दागिने एका कागदात बांधून साडीत गुंडाळून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर चलाखीने विश्वास संपादन करत त्यांनी दागिन्यांची अदलाबदल करून ते लंपास केले.
या फसवणुकीत फिर्यादीचे १ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र व कानातील टॉप्स असा ऐवज गेला आहे.या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा क्रमांक २६१/२०२६ नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, अशा प्रकारे विधी, औषध, चमत्कार किंवा अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू व्यक्तींना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4656922
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *