रत्नागिरी: इयत्ता दहावी आणि बारावीच्या आगामी परीक्षा अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि पूर्णपणे गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कोकण विभागीय परीक्षा मंडळाने एक अत्यंत कठोर आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या परीक्षा केंद्रांमधील प्रत्येक वर्गख खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नसतील, ती परीक्षा केंद्रे थेट रद्द केली जाणार आहेत. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सध्या कोकण मंडळाकडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील एकूण १७५ परीक्षा केंद्रांची फेरतपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखणे, कॉपीमुक्त वातावरण निर्माण करणे आणि परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवून ठेवणे हे परीक्षा मंडळापुढील मोठे आव्हान असते. या पार्श्वभूमीवर कोकण बोर्डाने यंदा सुरुवातीपासूनच कडक धोरण अवलंबले आहे. केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उपलब्धता हाच एकमेव निकष नसून, केंद्रावर आवश्यक असणारी विद्यार्थी संख्या आणि इतर मूलभूत भौतिक सुविधांचा अभाव आढळल्यास अशी केंद्रे देखील तात्काळ प्रभावानी रद्द केली जाणार आहेत.
अशा प्रकारे एखादे परीक्षा केंद्र रद्द झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मंडळाने पूर्वकाळजी घेतली आहे. रद्द करण्यात आलेल्या केंद्रांतील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्याच इतर सर्व सोयीसुविधांनी युक्त आणि मान्यताप्राप्त परीक्षा केंद्रांमध्ये केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या नाहक त्रासाला किंवा अडचणीला सामोरे जावे लागणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.
परीक्षांच्या पूर्वतयारीचे नियोजन वेळेत आणि सुटसुटीत व्हावे यासाठी कोकण परीक्षा मंडळाने ही संपूर्ण तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २० ऑगस्ट ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. दिलेली मुदत संपण्यापूर्वी सर्व केंद्रांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन अंतिम अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी मंडळाने तब्बल १६ विशेष पथके मैदानात उतरवली आहेत. या पथकांमध्ये विभागीय मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. ही सर्व पथके प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर जाऊन पाहणी करत आहेत.
सध्या सुरू असलेल्या या व्यापक फेरतपासणी मोहिमेमध्ये दहावीची एकूण ११४ केंद्रे आणि बारावीची ६१ केंद्रे अशा एकूण १७५ केंद्रांचा समावेश आहे. यात इयत्ता दहावीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ७३ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ केंद्रांची तपासणी केली जात आहे. दुसरीकडे, इयत्ता बारावीसाठी रत्नागिरीतील ३८ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रांचा ताळेबंद मांडला जात आहे.
कोकण बोर्डाच्या या आक्रमक आणि कडक भूमिकेमुळे दोन्ही जिल्ह्यांतील शाळा प्रशासनामध्ये आणि केंद्र संचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विहीत मुदतीत वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे आणि इतर भौतिक सुविधांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान आता केंद्र चालकांसमोर निर्माण झाले आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा अत्यंत कडक आणि पारदर्शक वातावरणात पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सीसीटीव्ही नसणारी परीक्षा केंद्रे थेट रद्द होणार; कोकण विभागीय मंडळाचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कठोर निर्णय
Leave a Comment



