आम्ही सिद्ध लेखिका संस्थेत रत्नागिरीच्या सदस्यांवर महत्त्वाची जबाबदारी

Gramin Varta
139 Views

रत्नागिरी: आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. कार्यकारिणीमध्ये रत्नागिरीच्या दोघी सदस्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची वार्षिक सभा तसेच संस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात बिनविरोध पार पडली. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. पद्मा हुशिंग (ठाणे) यांची एकमताने पुनर्नियुक्ती करण्यात आली. ठाणे येथील ज्येष्ठांचे नंदनवन सभागृहात ही निवडणूक झाली. अॅड. उमा धापटे यांच्या मार्गदर्शनाखाली नयना सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वासंती वर्तक यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील संस्थेचे सर्व आजीवन सदस्य, विश्वस्त, सल्लागार, माजी कार्यकारिणी पदाधिकारी, विभाग प्रमुख तसेच जिल्हा शाखा प्रमुख यावेळी उपस्थित होत्या. सचिव वृषाली राजे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.

उर्वरित नवनिर्वाचित कार्यकारिणी अशी – उपाध्यक्ष शुभांगी गान (नागपूर), सचिव मानसी जोशी, कार्याध्यक्ष यामिनी पाठक (पुणे), खजिनदार प्रतिभा चांदुरकर, (ठाणे), सहखजिनदार अस्मिता चौधरी (ठाणे), सहसचिव प्रा. स्नेहल पाठक (मराठवाडा-बीड), सुनेत्रा जोशी (रत्नागिरी), कार्यकारिणी सदस्य – माधुरी नवरे (डोंबिवली), वैशाली जोशी (डोंबिवली), देविका देशमुख (अकोला), मनीषा पाटील (सांगली), माधुरी चौधरी (संभाजीनगर), कविता कठाणे (विदर्भ), ऋतुजा उमेश कुळकर्णी (रत्नागिरी), संध्या प्रमोद महाजन (जळगाव) आणि ज्योती राजन टिपणीस (ठाणे).

या निवडणुकीत आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा जोशी यांची मध्यवर्ती संस्थेच्या सहसचिवपदी तसेच ऋतुजा उमेश कुळकर्णी यांची मध्यवर्ती संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य तसेच प्रसिद्धी प्रमुखपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभागातील साहित्यिक व लेखिका चळवळीला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने या दोन्ही नियुक्त्या महत्त्वपूर्ण आहेत.

संस्थेच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत संपूर्ण कार्यकारिणीची निवड बिनविरोध होणे हे संस्थेतील एकजूट, परस्पर विश्वास आणि साहित्यिक कार्याला दिलेले महत्त्व याचे द्योतक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला लेखिकांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या साहित्यिक कार्याला प्रोत्साहन देणे आणि विविध साहित्यिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला.

Total Visitors :
4717973
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *