GRAMIN SEARCH BANNER

राजापूर आगारातील एसटी बस वाहकाचा प्रामाणिकपणा; हरवलेले पाकीट प्रवाशास केले परत

Gramin Varta
40 Views

राजापूर/ राजू सागवेकर: आजच्या धावपळीच्या जीवनात, जिथे प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला आहे, तिथे राजापूर एसटी आगारातील बसवाहक श्री. विजय जाधव यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाने एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी एका प्रवाशाचे बसमध्ये हरवलेले पाकीट शोधून त्याला परत केले, ज्यामुळे एसटी विभागावरील सामान्य प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

राजापूरहून दुपारी ११.१५ वाजता सुटणाऱ्या राजापूर-जैतापूर (टपाल) एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे पाकीट बसमध्येच पडले. कर्तव्यनिष्ठ बसवाहक श्री. विजय जाधव यांच्या निदर्शनास ते येताच त्यांनी तात्काळ ते उचलले. त्यांनी पाकिटातील कागदपत्रे आणि फोटो पाहून प्रवाशाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाकिटातील फोटोवरून तो प्रवासी कोंबे स्टॉप येथे उतरल्याचे त्यांच्या लक्षात आले.
जैतापूरहून परत येताना जाधव यांनी बस कोंबे स्टॉपवर थांबवून चौकशी केली. त्यावेळी श्री. राजू सागवेकर आणि रवींद्र (बब्या) कातकर यांनी फोटोतील व्यक्ती साखर गावातील घाडी गुरव वाडीतील श्री. रमेश गुरव असल्याचे ओळखले. त्यांनी श्री. जाधव यांना पाकीट सुरक्षितपणे रमेश गुरव यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
श्री. जाधव यांच्या या प्रामाणिकपणामुळे श्री. रमेश गुरव यांना त्यांचे पाकीट, त्यातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे आणि पैसे सुरक्षितपणे परत मिळाले. पाकीट परत मिळाल्यानंतर रमेश गुरव यांनी बसवाहक विजय जाधव यांचे मनापासून आभार मानले.

विजय जाधव यांच्या या कृतीमुळे एसटी विभाग आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रतिमा उंचावली आहे. अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा सार्वजनिक सत्कार आणि गौरव होणे आवश्यक आहे, अशी भावना सर्वसामान्य प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. एसटीसारख्या सार्वजनिक सेवांमध्ये असे प्रामाणिक कर्मचारी असल्यानेच सर्वसामान्यांचा या विभागावरील विश्वास आजही टिकून आहे.

Total Visitor Counter

3073034
Share This Article