राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासासाठी सहकार्य करा – मंत्री नितेश राणे

Gramin Varta
91 Views

मुंबई: तळसुंदे येथील राजापूर बंदर आणि प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

राजापूर बंदर व प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाबाबत ‘अँड शुअर पोर्ट प्रा. लि.’ या कंपनीच्या वतीने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयात सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पासाठी कंपनीने राजापूर येथे सुमारे १०० एकर जागा अधिग्रहित केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी गुंतवणूकदार तसेच सक्षम भागीदार सहकार्य करण्यास इच्छुक आहेत. या माध्यमातून प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून संबंधितांना सहकार्य करण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.

राजापूर परिसरातील उपलब्ध क्षमता आणि बंदराच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती तसेच बंदराशी संबंधित विविध उपक्रम विकसित झाल्यास परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. कोकणातील बंदर विकासाला गती देतानाच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्प महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -
Total Visitors :
4756343
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *