चिपळूण: अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बहुचर्चित रवींद्र सुर्वे खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय विनायक सुर्वे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठाने जोरदार दणका दिला आहे. गुन्ह्याचे अत्यंत गंभीर स्वरूप, प्राणघातक शस्त्राचा झालेला वापर आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे सबळ पुरावे विचारात घेत उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज कठोर शब्दांत फेटाळून लावत त्याची तुरुंगातील रवानगी कायम ठेवली आहे.
चिपळूण सत्र न्यायालयाने यापूर्वी जामीन नाकारल्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या या कडक भूमिकेमुळे गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर कायद्याचा धाक निर्माण झाला असून पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
२४ ऑगस्ट २०२३ रोजी रवींद्र सुर्वे यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांच्या खोलीमध्ये आढळून आला होता, ज्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. घटनेच्या रात्री आरोपी संजय सुर्वे, सह-आरोपी वसंत हिलाम आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मंगेश मोहिते एकत्र मद्यप्राशन करत असताना मोबाईल फोनवरून हा जीवघेणा वाद पेटला होता. या वादातून मुख्य आरोपी संजय सुर्वे याने तलवारीने डोक्यावर, कमरेवर आणि हातावर प्राणघातक वार केले, तर सह-आरोपीने लोखंडी पाईपने मारहाण करून रवींद्र सुर्वे यांचा निर्घृण बळी घेतला. घटनेनंतर २५ ऑगस्ट २०२३ रोजी पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.
सध्या या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू असून सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने साक्षीदारांच्या जबाबातील विरोधाभास व तपासातील त्रुटींचा आधार घेत सुटकेचा प्रयत्न केला. मात्र सरकारी वकिलांनी गुन्ह्याची भयानक क्रूरता न्यायालयासमोर मांडत जामिनाला तीव्र विरोध दर्शवला. मृतदेह आरोपीच्याच ताब्यात असलेल्या जागेत सापडणे, शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर भीषण वार झालेले असणे, दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेले जबाब आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष या बाबी आरोपीचा थेट सहभाग सिद्ध करणाऱ्या असल्याने सरकारी पक्षाची बाजू अत्यंत मजबूत ठरली. तपासादरम्यान समोर आलेल्या धक्कादायक तथ्यांमुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले असून उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने तपास यंत्रणेच्या निष्कर्षांवर शिक्कामोर्तब झाले आहे. दोषींवर कठोर कारवाई होईल, असा ठाम विश्वास आता व्यक्त केला जात आहे.






