दहीहंडी उत्साहाला दुखापतींची किनार; मुंबईत ३७६ गोविंदा जखमी, ५३ रुग्णालयात दाखल

Gramin Varta
69 Views

एमएमआरमध्ये दोघांचा मृत्यू

मुंबई: महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच मुंबई आणि उपनगरांमध्ये या उत्सवाला दुखापतींची किनार लागली आहे. मानवी मनोरे रचताना आणि दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात मोठ्या संख्येने गोविंदा जखमी झाले आहेत.

मुंबई महापालिका आणि विविध शासकीय रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबई महानगर क्षेत्रातील विविध रुग्णालयांमध्ये तब्बल ३७६ जखमी गोविंदांची नोंद झाली आहे. यापैकी ५३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ३७ गोविंदांवर सध्या उपचार सुरू आहेत. उपचारानंतर २८६ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मध्य विभागातील रुग्णालयांमध्ये सर्वाधिक १८३ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी २९ जणांना दाखल करण्यात आले असून २३ जण उपचाराधीन आहेत, तर १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पूर्व उपनगरातील रुग्णालयांमध्ये ६२ जखमी गोविंदांची नोंद झाली असून ११ जण दाखल झाले होते आणि ५१ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. पश्चिम उपनगरातील रुग्णालयांमध्ये १२६ गोविंदा जखमी झाले असून नऊ जण दाखल आहेत, १४ जणांवर उपचार सुरू आहेत, तर १०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्णालयनिहाय आकडेवारीत केईएम रुग्णालयात सर्वाधिक ७६ जखमी गोविंदांची नोंद झाली आहे. यापैकी १८ जणांना दाखल करण्यात आले असून सर्वांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. नायर रुग्णालयात ३२ गोविंदा जखमी झाले असून तीन जण दाखल आणि २९ जण डिस्चार्ज झाले आहेत. राजावाडी रुग्णालयात ३३, एचबीटी ट्रॉमा रुग्णालयात ३४ आणि व्ही. देसाई रुग्णालयात ३३ जखमींची नोंद झाली आहे. सायन रुग्णालयात १८ गोविंदा जखमी झाले असून चार जण दाखल, आठ जण उपचाराधीन आणि सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली होती. महापौर रितू तावडे यांनी केईएम रुग्णालयाला भेट देऊन जखमी गोविंदांची विचारपूस केली आणि त्यांना वेळेत व दर्जेदार उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

दरम्यान, दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबई आणि नवी मुंबईत गोविंदांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उंच मानवी मनोरे उभारताना सुरक्षा जाळी, हार्नेस, सुरक्षा दोर, प्रशिक्षित स्वयंसेवक, वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिकांची पुरेशी व्यवस्था असणे आवश्यक असल्याचे या घटनांमधून अधोरेखित झाले आहे. उत्सवाचा उत्साह कायम ठेवताना गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Total Visitors :
4819934
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *